साल १९९२. टिळकांनी डेक्कन एजुकेशन सोसायटी सोडली आणि ‘पूर्ण स्वराज्या’ची मागणी पुढे करून, स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.
केसरीमध्ये टिळकांचा त्यांनतर अग्रलेख आला होता. केशवरावांना विठ्ठलराव आणि गिरिरावांसोबत या विषयावर बोलायचं होते. परंतु कोर्टात वकील कक्षात कित्येकदा निजाम धार्जिणे मुसलमान वकील असत. त्यांच्यासमोर या विषयावर बोलणे योग्य नव्हते. तिघेही एकमेकांना पहिल्या नावाने संबोधत, परंतु अहो-जाहोच करत. केशवराव म्हणाले,
“विठ्ठलराव, गिरिराव, बऱ्याच दिवसात तुम्ही दोघे घरी आला नाहीत. आज संध्याकाळी जेवायलाच या.”
“आणि दोघेही सपत्नीक या. गीताबाई, साळूबाई आणि सुभद्राबाई यांची घट्ट मैत्री आहे. त्या तिघींना देखील आनंद होईल.”
भेटण्याचे कारण स्पष्ट करायची कोणालाच आवश्यकता नव्हती. दोघांनीही स्मित करत होकार दिला. संध्याकाळी विठ्ठलराव आणि गिरिराव दोघेही केशवरावांबरोबर परस्पर कोर्टातून केशवरावांच्या घरी आले. विठ्ठलराव आणि गिरिराव यांनी दुपारीच घरी निरोप धाडला होता. साळूबाई आणि सुभद्राबाई गीताबाईंच्या मदतीला म्हणून दुपारीच गीताबाईंकडे पोहोचल्या होत्या.
चहापान झाल्यानंतर तिघांच्या गप्पांना रंग आला. हातात केसरीचा अंक घेऊन केशवराव म्हणाले,
“या पुणेकर सुधारकवाद्यांचा वाद फारच विकोपाला गेलेला दिसतोय. टिळकांनी डेक्कन एजुकेशन सोसायटी मधून राजीनामा दिलाय आणि ते आता इंग्रज सरकारपाशी ‘पूर्ण स्वराज्या’ची मागणी करत आहेत. या माणसाच्या धैर्याची खरोखर कमाल आहे”
“पण खरं सांगू विठ्ठलराव, याआधी घरोघरी जागृती व्हावयाला पाहिजे. इंग्रज इतक्या सहज ऐकणाऱ्यातले नाहीत. जोपर्यंत संपूर्ण समाज जागा होत नाही तोपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा मुश्किल आहे. नामदार गोखले म्हणतात त्याप्रमाणे प्रथम शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरा थांबल्या पाहिजेत.”
“आपल्या निजाम राज्यात तर हे अधिक महत्वाचे. पुण्या - मुंबईला काही अंशी तरी जाणकार लोक आहेत. आपल्या मराठवाड्यात तर साक्षरता जवळ जवळ नाहीच.”
“केशवराव, टिळकही काही या सुधारणांच्या विरुद्ध नाहीत. परंतु, त्यांचा मुद्दा हा की, हा आपला अंतर्गत प्रश्न आहे. त्यात इंग्रंजांनी ढवळाढवळ करण्याची गरज नाही. आम्हाला पूर्ण स्वराज्य हवे आहे. एकदा स्वराज्य मिळाल्यावर ह्या सर्व गोष्टी आम्ही सोडवू… “ विठ्ठलरावांनी स्पष्टीकरण दिले.
“खरं तर हा वाद मला आपल्या देशाच्या दृष्टीनं फोल वाटतो. या सर्व वादात आपण फक्त शहरात राहणाऱ्यांचा विचार करतोय. आज देशातले बहुतांश लोक खेड्यात राहतात. एवढ्याना आपण शिक्षण कुठपर्यंत पोहोचवणार? किती जणांना शहरात येऊन शाळा शिकणं शक्य आहे. त्यासाठी किती पिढ्या जातील?” गिरिराव विषण्ण मानाने बोलले.
केशवरावांनी आपला मुद्दा परत नेटाने मांडला,
“विठ्ठलराव, टिळकांचा विचार रास्त आहे. परंतु मूठभर नेत्यांच्या गर्जनेला जुमानणारा हा इंग्रज नाही. जोपर्यंत संपूर्ण देश उठून उभा राहात नाही तोपर्यंत स्वातंत्र्याची आशा कारणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. तेंव्हा शिक्षणाद्वारे आणि सामाजिक परिवर्तनानेच काही बदल घडवून आणता येईल. त्यातून मराठवाड्यासाठी हा विषय आणखी बिकट आहे. पुण्या-मुंबईसारखा विकास अजून येथे झालेला नाही. साक्षरता तर जवळ जवळ नसल्यात जमा आहे. त्यातून आपला लढा निजामाशी आहे. आपल्यातीलच अनेक लोक त्याला सामील आहेत. त्यामुळे जहाल विचार मराठवाड्यात अवलंबणे अशक्य आहे.”
“जास्तीतजास्त शाळा-कॉलेज सुरु करणं आवश्यक आहे. या शाळांमधून आपल्या संस्कृतीशी संलग्न असं शिक्षण द्यायला पाहिजे. वर्तमान पत्रे आणि नियतकालिके चालू करून घराघरात ती पोहोचली पाहिजेत. ठिकठिकाणी वाचनालये सुरु झाली पाहिजेत. समाजातील रूढी परंपरा नष्ट करून जातीभेद मिटवला पाहिजे. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांना प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे”
“गिरिराव, तुमची नाळ आजही खेड्याशी जुळली आहे. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. परंतु आपल्याला कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक आहे. आपलं ध्येय आपल्या हयातीत पूर्ण होण्याची चिन्ह नाहीत. परंतु निदान आपल्यापुढची एक सक्षम पिढी तरी आपण निर्माण करू शकतो. ती पिढी आपलं काम पुढे नेईल.”
“केशवराव, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. परंतु या वादात न पडता आता कामाला लागणं जास्त योग्य ठरेल. एकदा काम सुरु केले की वाट आपोआप मिळत जाईल. पुणेकरांनी आपल्याला दिशा दाखवली आहे. तेंव्हा विचार करण्यात वेळ न घालवलेला बरा. पुढची पायरी काय ते आता ठरवू.”
विठ्ठलराव तळमळीनं म्हणाले.
“चला तर…"
केशवराव तातडीने उठले आणि हात समोर करून उभे राहिले.
“आज आपण तिघे प्रतिज्ञा घेऊ. शिक्षणाचा प्रसार आणि समाज परिवर्तनातून आपल्या पुढची एक अशी पिढी तयार करू जी या देशाला निजामापासून आणि इंग्रजांपासून मुक्ती देईल”
विठ्ठलराव आणि गिरिराव देखील जागचे उठले. त्यांनी केशवरावांच्या हातावर हात ठेवले आणि तिघे उद्गारले…
“शपथ घेतो…शपथ घेतो…शपथ घेतो…”
खालच्या तिपाईवर पडलेला केसरीचा अंक केलेल्या प्रतिज्ञेला साक्ष होता…
दिवाणखान्यातील गडबड ऐकून साळूबाई, सुभद्राबाई आणि गीताबाई एव्हाना बाहेर आल्या होत्या. सारा प्रकार त्यांच्या डोळ्यासमोर झाला. भारावलेल्या त्या मित्रांना पाहून साऱ्यांच्या डोळ्यात आदर आणि येणाऱ्या वादळाची चाहूल होती.
त्यानंतर साऱ्यांनी मुक्त मनाने आणि समाधानाने भोजन केले.
लाविले वचनांचे | रोप मातीत या |
वाहिले जागृतीचे | वारे देशात या ||
केशवरावांचे पुण्याशी संबंध
केशवरावांनी पुण्याशी संबंध आधीपासूनच ठेवला होता. उन्हाळ्याच्या सुटीत केशवराव सहकुटुंब पुण्यात राहावयास जात. पुण्यात चालणाऱ्या वसंत व्याख्यान मालेचे खास आकर्षण केशवरावांना असे. आपले पुण्याचे वास्तव्य व्याख्यानमालेच्या आराखड्याप्रमाणे ठरवत. गिरिराव अण्णा यांचा वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांशी चांगले संबंध होते. गिरिराव अण्णांचा वारकरी सांप्रदायाचा गाढा अभ्यास. त्यात संत तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाची विशेष आवड. वसंत व्याख्यानमालेत स्वतः गिरिराव अण्णांचे तुकाराम महाराजांवरील भाषण खुप गाजले होते. गिरिराव अण्णांच्या ओळखीने केशवराव देखील या आयोजकांच्या संपर्कात आले. न्यायमूर्ती रानड्यांनी वसंत व्याख्यानमालेची सुरुवात १८७५ साली सुरु केली. तेंव्हापासून अव्याहत चालू असलेली ही मालिका पुण्याचे एक भूषण होती.
पुण्याच्या वास्तव्यात केशवरावांना नामदार गोखले आणि बाळ गंगाधर टिळकांना भेटण्याचा योग आला. टिळकांच्या भेटीची आठवण सांगताना केशवरावांचा कंठ नेहमीच दाटून येई. टिळकांच्या भेटीत त्यांनी खुर्चीवर न बसता टिळकांच्या खुर्ची समोर अंथरलेल्या सतरंजीवर बसण्याचे पसंत केले हे केशवराव अभिमानाने सांगत.
केशवरावांचा वकिली व्यवसाय गुलबर्ग्याला जोमाने चालला होता. विठ्ठलराव आणि गिरिराव यांच्यासारखे समविचारी मित्र केशवरावांना मिळाले होते. त्यातून केशवरावांच्या भावी समाजकार्याची नांदी झाली होती. यातच भर म्हणून गीताबाईंनी खुश खबर दिली. गीताबाईंना दिवस गेले होते. केशवरावांच्या आणि गीताबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. केशवराव गीताबाईंना काय हवं नको ते जातीनं बघू लागले. जसे दिवस उलटू लागले तसे केशवराव गीताबाईंना माहेरी देशमुखांकडे कळंब येथे बाळंतपणासाठी सोडून आले.
३ फेब्रुवारी १८९५. केशवराव नेहमीप्रमाणे कोर्टात गेले. त्यादिवशीच्या खटल्यांचा अभ्यास केला. तेवढ्यात कळंबच्या देशमुख वाड्याचा खास माणूस वकील-दालनात लगबगीने शिरला. केशवरावांकडे येत तो म्हणाला,
“मालक, खुश खबर आहे. तुम्ही वडील झालात. तुम्हाला पुत्ररत्न झाले.”
आनंदाने केशवरावांच्या डोळ्यात पाणी आले. विठ्ठलराव, गिरिराव आणि इतर सहकाऱ्यांना केशवरावांनी आनंदाची बातमी सांगितली आणि केशवराव कळंबकडे रवाना झाले.
बाराव्या दिवशी मुलाचे बारसे करण्यात आले. मुलाचे नाव विनायक ठेवण्यात आले. बारशाला कोरटकर आणि देशमुखांकडली मंडळी आवर्जून हजर होती.
हैद्राबादेस स्थलांतराची तयारी
केशवरावांचा हैद्राबादशी संबंध आला तो एका खटल्याच्या संबंधात. त्यांनी गुलबर्ग्यात चालवलेल्या ह्या खटल्याचे अपील हैदराबादच्या हायकोर्टात गेले. आपली बाजू मांडण्यासाठी त्याना हैद्राबाद येथे एका चांगल्या वकिलाची आवश्यकता होती. माहितीअंती रामाचारी वकिलांचे नाव पुढे आले. रामाचारी वकील त्याकाळी हैदराबाद हायकोर्टात एक चांगले वकील म्हणून प्रसिद्ध होते. केशवरावांनी रामाचारी यांच्या बरोबर नियमित पत्रव्यवहार तर केलाच, परंतु त्यांच्या भेटीस हैद्राबादला जाऊन आले.
पुढे वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांच्या गाठी भेटी वाढत गेल्या. केशवरावांच्या कामाच्या पद्धतीने रामाचारी वकिलांना केशवरावांबद्दल नितांत आपुलकी वाटू लागली. पुढे पुढे केशवरावांचे खटले रामाचारी वकील केशवरावांनाच कोर्टापुढे मांडण्याचा आग्रह करत. रामाचारी वकिलांचा सल्ला मात्र यात खचितच केशवरावांना मिळे. केशवरावांचे प्राविण्य पाहून रामाचारी वकीलच काय, परंतु हायकोर्टातील न्यायाधीश देखील चकित होत. रामाचारी वकिलांनी एक दिवस केशवरावांसोबत विषय काढला,
“केशवराव, तुम्ही हायकोर्टात इतक्या शिताफीने खटला लढवता, तर तुम्ही हायकोर्टातच वकिली का करत नाही? हायकोर्टाला तुमच्या सारख्या वकिलांची गरज आहे.”
“तुमच्यासाठी गुलबर्गा क्षेत्र लवकरच छोटे होईल. हैद्राबाद हायकोर्टात तुम्हाला गुलबर्ग्याशिवाय औरंगाबाद, वारंगल येथूनही पक्षकार मिळतील.”
केशवरावांच्याही मनात हा विषय बऱ्याच दिवसांपासून घोळत होता. परंतु त्याचा त्यांनी खोलवर विचार केला नव्हता. केशवरावांनी आपली काळजी रामाचारी वकिलांना बोलून दाखवली,
“मला हायकोर्टात वकिली करायला निश्चित आवडेल. परंतु, मी मुळात वकिलीत शिरलो ते माझ्या बांधवाना न्यायालयात न्याय मिळवून देता यावा यासाठी. आणि जर मी त्यांच्यापासूनच दूर गेलो तर मी माझ्या निश्चयापासून दूर झालो असे होईल. इतकेच नाही तर माझ्या बांधवांसाठी शिक्षणाचा प्रसार करण्याचा माझा आणि माझ्या जीवश्च्य मित्रांचा मनसुबा आहे. त्या पासून देखील मी दूर जाईन”
परंतु रमाचारी वकिलांनी त्यांचा हट्ट सोडला नाही, ते म्हणाले,
“अहो, हे तर तुम्ही हैद्राबाद येथे जास्त जोमाने करू शकाल. आज मराठवाड्यातील किती वकील हायकोर्टात आहेत? तुमच्या येथे येण्याने उलट त्यांची सेवा तुम्ही जास्त योग्य प्रकारे कराल. राहिली गोष्ट शिक्षण प्रसाराची, त्याची तर हैरबादमध्ये देखील आवश्यकता आहे.”
“तुमचं म्हणणं मला पटतंय. पण मला विचार करायला थोडा वेळ द्या.”
असे म्हणून केशवरावांनी विषय पुढे ढकलला. परंतु त्यांच्या मनाने स्थलांतराबाबत उचल खाल्ली. गुलबर्ग्याला परतल्यावर केशवरावांनी गिरिराव अण्णा आणि विठ्ठलरावांबरोबर चर्चा केली. गीताबाईंचे मत याबाबतीत महत्वाचे होते. त्यांच्याबरोबर देखील केशवरावांनी चर्चा केली.
अखेर केशवरावांनी निर्णय घेतला. वयाच्या २९ व्या वर्षी केशवरावांनी गुलबर्गा सोडून हैद्राबाद येथे कायमचे स्थायिक होण्याचे ठरवले. केशवरावांच्या खऱ्या कारकिर्दीची ती सुरुवात होती…