१८९७ मध्ये पुणे शहर प्लेगच्या भयंकर रोगाने ग्रासले होते. अशा परिस्थितीतही इंग्रज अधिकारी जनतेला अपमानित करीत आणि त्रास देत. वॉल्टर चार्ल्स रँड आणि आयर्स्ट हे दोन ब्रिटीश अधिकारी पुण्यातून लोकांना जबरदस्तीने हुसकावून लावत होते. हिंदूंच्या प्रार्थना स्थळांमध्ये ते जोडे घालूनच प्रवेश करत असत. अशाप्रकारे प्लेगग्रस्तांना मदत करण्याऐवजी या अधिकाऱ्यांनी जनतेवर अत्याचार करणे हा आपला हक्कच मानला.
पुण्यात दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर हे हरिभाऊ चाफेकर यांचे तीन पुत्र होते. टिळकांच्या देशप्रेमाने तिन्ही भाऊ प्रभावित झाले होते. तिघेही टिळकांना गुरुवत आदर देत असत. परंतु पुढे या तिन्ही भावांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. या दोन ब्रिटीश अधिकाऱ्यांचा सूड घेण्याचा या तिघांनी निश्चय केला. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील शासकीय भवनात राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाची डायमंड ज्युबिली साजरी होणार होती. यामध्ये रँड आणि आयर्स्ट यांनीही सहभाग घेतला. दामोदर चाफेकर आणि त्यांचे बंधू बाळकृष्ण चाफेकर यांनी या दोन अधिकाऱ्यांना परतीच्या रस्त्यावर गाठले आणि अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात दोन्ही अधिकारी मारले गेले. दामोदर आणि बाळकृष्ण तेथून फरार झाले. परंतु दामोदर चाफेकर काही फितूरांमुळे पकडले गेले आणि बाळकृष्ण निजाम राज्यात भूमिगत झाले. भूमिगत असताना दगदगीने बाळकृष्ण चाफेकर आजारी पडले. ही खबर पुण्यात टिळकांना मिळाली.
साल १८९८. एक दिवस रावसाहेब आपल्या घरी आराम करत होते. विद्वांस नावाचे टिळकांच्या खास मर्जीतले एक गृहस्थ भेटायला आले होते. टिळकांकडून काही निरोप घेऊन ते आले होते. टिळकांनी आपली आठवण काढावी या विचारांनी रावसाहेब मनोमन आनंदी झाले. एवढ्या दुरून आलेल्या विद्वांसांचे रावसाहेबांनी आदरातिथ्य केले. विद्वांस मूळ मुद्यावर आले. खिशातून एक बंद लिफाफा काढून त्यांनी रावसाहेबांच्या हातात ठेवला. रावसाहेबांनी मोठ्या कुतूहलाने लिफाफा उघडला. आत टिळकांनी लिहिलेले पत्र होते. रावसाहेब पत्र वाचू लागले,
“बाळकृष्ण चाफेकर भूमिगत आहेत. व ते आपल्याकडील जंगलात अज्ञातवासात राहात आहेत. खाण्यापिण्याची सोय नसल्याने ते हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे व ते आजारी आहेत. त्यांना वाचविले पाहिजे. त्यांचा पत्ता शोधून त्यांच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची व्यवस्था गुप्तपणे होणे आवश्यक आहे. हे काम आपण कृपया करावे.”
वास्तविक रावसाहेब नामदार गोखल्यांचे अनुयायी. टिळकांचे राजकारण जहाल. परंतु टिळकांची देशभक्ती, तळमळ, स्वार्थत्याग, सच्चेपणा व विद्वत्ता याचा रावसाहेबांना नितांत आदर होता. टिळकांच्या विनंतीला नाकारणे रावसाहेबांच्या स्वप्नात देखील आले नाही. परंतु निजाम राज्यात ही जोखीम पत्करणे म्हणजे कठोर परिस्थिती ओढवून घेणे. परंतु रावसाहेबांनी न डगमगता विद्वंसना निरोप दिला,
“टिळकांना माझा निरोप द्या, सांगा… तुम्ही निश्चितं राहा. आम्ही दिलेली जबाबदारी चोख बजावू.”
दिलेल्या शब्दाप्रमाणे रावसाहेबांनी बाळकृष्ण चाफेकरांना योग्य ती औषधे आणि वेळोवेळी अन्न पुरवले. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे वेळोवेळी स्थलांतर केले. निजाम राज्यात बाळकृष्ण चाफेकर आहेत ही खबर पुष्कळांना होती. पण त्यांचे नक्की ठिकाण रावसाहेब आणि त्यांच्या निवडक माणसांनाच माहित असे. कधी बाळकृष्ण धूळपेठेतल्या हनुमान मंदिरात राहतो अशी अफवा असे तर कधी तो चनरायन गुट्टा या भागात दडलाय अशी माहिती असे. कधी तो रायचूर जवळ रानात आहे असे सांगितले जाई. ही माहिती त्यांनी अगदी गीताबाईंपासून देखील गुपित ठेवली होती. गीताबाईंनी एकदोनदा बाळकृष्ण कोठे आहे ते विचारण्याचा प्रयत्न देखील केला. त्यावर रावसाहेब म्हणाले,
“गीताबाई, याबाबत तुम्हाला काही माहिती नसणं हेच योग्य आहे. आमचा तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, परंतु अशा गोष्टी जितक्या कमी बोलल्या जातील तितकं चांगलं…”
बाळकृष्णची तब्येत ठीक झाल्यानंतर बाळकृष्ण चाफेकर पुढच्या प्रवासाला गेले. दुर्दैवानं पुढे १८९९ मध्ये ब्रिटिशांनी बाळकृष्णाचा शोध घेतला आणि त्याला पकडून फाशी दिले.
साल १९०१. विनायक आता ६ वर्षाचा झाला होता. रावसाहेब आणि गीताबाईंच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण आले. गीताबाईंना दुसऱ्यांदा दिवस गेले होते. १९०१ च्या अखेरीस रावसाहेब छोट्या विनायकला आणि गीताबाईंना माहेरी कळंबला सोडून आले. अखेर तो दिवस उजाडला. २ फेब्रुवारी २००२ या दिवशी रावसाहेब आणि गीताबाईंना दुसरे पुत्ररत्न उपजले. खबर मिळताच रावसाहेब हातातली कामे बाजूला ठेऊन कळंबला रवाना झाले.
बाराव्या दिवशी मुलाचे बारसे झाले. गुलबर्ग्याहून रावसाहेबांच्या भगिनी बाळूबाई आत्याच्या नात्याने बारश्यासाठी कळंबला आल्या. रावसाहेबांच्या दुसऱ्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले. सर्व घरात आनंद पसरला. रावसाहेबांना कामानिमित्त हैद्राबादला परत यावे लागले. विनायकाचा वडिलांवर फार जीव. तो रावसाहेबांना सोडायला तयार नव्हता.
“गीताबाई, खरं सांगू, पाय निघत नाही. विनायक आणि आता विठ्ठल. तुम्ही सारे इथे असताना हैद्राबादमध्ये मन लागत नाही. पण काही इलाज नाही. अनेक कामं खोळंबली आहेत.”
रावसाहेबांच्या डोळ्याच्या कडा बोलताना ओलावल्या. पुढे काही न बोलता रावसाहेबांनी गीताबाईंचा आणि देशमुख कुटुंबीयांचा निरोप घेतला आणि ते हैद्राबादला परतले.
विठ्ठल तीन महिन्याचा झाल्यावर गीताबाई दोन्ही पुत्रांसह हैद्राबादला परतल्या.
स्वामी दयानंद सरस्वतींनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि त्यानंतर आर्य समाजाला तत्कालीन समाजात फार मोठे समर्थन मिळाले. राष्ट्राच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जागृतीतीत आर्य समाजाला फार मोठे स्थान मिळाले. परंतु स्वामी दयानंदांच्या पश्च्यात आर्य समाजात तात्विक विचारांवरून दोन गट पडले. पुरोगामी आणि सनातनी हे ते दोन गट. पुरोगामी गटाचा पाश्चात्य शिक्षण पद्धतीवर विश्वास. तर सनातनी गटाचा आपल्या संस्कृतीस अनुसरून वैदिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे हा आग्रह.
साल १९०२. सनातनी प्रवाहाचे नेतृत्व त्याकाळी स्वामी श्रद्धानंद करत असत. स्वामी श्रद्धानंद हे दयानंद सरस्वती यांचे पट्टशिष्य आणि सनातनी प्रवाहाचे आद्य समर्थक होते. स्वामी श्रद्धानंदांनी हरिद्वार जवळ कांगडी या ठिकाणी एका भव्य गुरुकुलाची स्थापना केली. या गुरुकुलामध्ये ६ ते ८ वर्षातील वयोगटाच्या हुशार विद्यार्थ्यांना दाखला देऊन त्यांना १४ वर्षे वैदिक पद्धतीने शिक्षण दिले जाई. मुलांना शास्त्र, गणित या शिवाय संस्कृत, इंग्रजी, हिंदी आदी भाषांचे शिक्षण दिले जाई. शिक्षण १४ वर्ष चाले व मुलांना प्रलोभनांपासून दूर ठेवण्यासाठी या काळात आपल्या घरी जाता येत नसे. इतकेच नाही तर पालकांना आपल्या मुलांना वर्षातून केवळ एकदाच भेटण्याची मुभा असे.
गुरुकुलाचा निधी गोळा करण्यासाठी स्वामीजी राष्ट्रव्यापी दौऱ्यावर होते. याचाच एक भाग या नात्याने स्वामीजी हैद्राबाद येथे आले होते. स्वामीजींनी रावसाहेब आणि कुंवर बहाद्दूर यांना भेटण्यासाठी न्योता पाठवला. दोघांनाही भेटीच्या विषयाची साधारण कल्पना होती. दोघेही ठरलेल्या वेळी स्वामीजींच्या भेटीसाठी हजर झाले. स्वामीजींनी विषयाला सुरुवात केली,
“आपणा दोघांना भेटण्याचा हेतू तुम्हाला कळलाच असेल. कांगडी येथील गुरुकुलाच्या बांधकामाचं काम जोरात चालू आहे. यासाठी आपल्याला निधीची नितांत आवश्यकता आहे. तुम्हा दोघांकडून आमची या बाबतीत मोठी अपेक्षा आहे.”
केशवरावांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले,
“स्वामीजी, याबाबतीत आपण निश्चितं राहा. आम्ही दोघे गुरुकुलाच्या निधीत तर भर घालूच, परंतु हैद्राबादमध्ये अनेक सधन लोक आहेत. त्यांच्या कडून देणग्या मिळवण्याचा संपूर्ण प्रयत्न करू. आम्ही त्या दिशेने आधीच पावले उचलली आहेत.”
स्वामीजींच्या चेहेऱ्यावर समाधान पसरले. स्वामीजी म्हणाले,
“आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. परंतु तुम्हा दोघांकडे आणखी एक काम आहे”
कुंवर बहाद्दूर उत्तरले,
“स्वामीजी आज्ञा करा. आम्ही आपल्या शब्दाबाहेर नाही”
स्वामीजींनी मूळ विषयाला हात घातला,
“केशवराव, कुंवर बहाद्दूर, मला कल्पना आहे की तुम्हा दोघांचे पुत्र गुरुकुलाच्या शिक्षणासाठी योग्य वयाचे आहेत. तुम्ही दोघांनी आपल्या पुत्रांना गुरुकुलात शिकण्यासाठी पाठवावे ही माझी विनंती आहे. गुरुकुलास योग्य विद्यार्थी मिळाले नाही तर गुरुकुल बांधण्याचा काय उपयोग?”
स्वामीजींची अपेक्षा पाहून दोघांच्याही पोटात गोळा आला.
रावसाहेबांचे विनायकवर अतोनात प्रेम होते. विनायकला १४ वर्ष आपल्यापासून दूर ठेवण्याची कल्पना देखील रावसाहेबांना करता येत नव्हती. त्यातून गीताबाईंची या प्रस्तावाला मंजुरी मिळणे कदापि शक्य नव्हते. एक वेळ स्वामीजींनी सर्व संपत्ती मागितली असती तरी ते देणे एवढे अवघड नव्हते परंतु ही मागणी रावसाहेबांना निश्चितच अपेक्षित नव्हती. विनायकला इंग्लंडमध्ये बॅरिस्टर करण्याची रावसाहेबांची इच्छा होती.
दुसऱ्या बाजूला रावसाहेबांची गुरुकुल शिक्षण पद्धतीवर अतोनात श्रद्धा होती. गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची पात्रता इतर कोणत्याही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असेल यावर रावसाहेबांचा दृढ विश्वास होता. विनायकने आपला समाजकारणाचा वारसा चालवावा ही रावसाहेबांची इच्छा होती. त्यासाठी लागणारे गुण विनायकला गुरुकुलात मिळतील याबद्दल रावसाहेबांना कोणतीही शंका नव्हती.
रावसाहेबांची स्वामीजींवर नितांत श्रद्धा होती आणि स्वामीजींचा ते अतिशय आदर करत. स्वामीजींनी एवढ्या मोठ्या अपेक्षेने केलेल्या विनंतीची अवहेलना करणे रावसाहेबांना अशक्य होते.
जड अंतःकरणाने रावसाहेब म्हणाले,
"स्वामीजी, आपली विनंती आम्हाला आज्ञेसमान आहे. परंतु आम्हाला याबाबतीत थोडा वेळ द्यावा ही विनंती आहे"
स्वामीजींचा निरोप घेऊन रावसाहेब आणि कुंवर बहाद्दूर दोघेही बाहेर पडले. दोघेही बराच वेळ काहीही बोलत नव्हते. शेवटी रावसाहेब म्हणाले,
"कुंवर साहेब, याबाबतीत थोडा विचार करून सांगतो"
सर्वतोपरी विचार केल्यानंतर रावसाहेब विनायकला कांगडीला पाठविण्याच्या निर्णयास पोहोचले. विनायकचे यातच भले आहे याची त्यांना खात्री पटली. प्रश्न गिताबईना कसे समजवावे हा होता. गीताबाईंना हा प्रस्ताव कधीच मंजूर होणार नव्हता. रावसाहेबांनी विनायकला एकांतात बोलावले. त्याला कांगडी शाळेबद्दल माहिती सांगितली.
"विनायक, या शाळेत तू शिकलास तर तुझं भविष्य उज्वल होईल याची मी खात्री देतो. तू या शाळेत शिकायला जावस ही माझी खूप इच्छा आहे. परंतु तुमच्या आईंना हे समजावणं खूप अवघड आहे. अर्थात त्याची जबाबदारी मी घेतो. परंतु, तुला हा प्रस्ताव मान्य आहे किंवा नाही हे मला समजावून घ्यायचं आहे. १४ वर्ष तुला कंगडीला आई वडिलांपासून दूर राहावं लागेल. याची तयारी आहे तुझी?"
विनायक जेमतेम आठ वर्षाचा होता. या सर्वाचा खोलवर विचार करण्याचे त्याचे वय नव्हते. परंतु वडिलांवर त्याचे नितांत प्रेम होते आणि त्यांच्याबद्दल आदर होता. वडील जे काही करतील ते निश्चितच आपल्या हिताचं असणार हा गाढ विश्वास विनायकला होता. विनायक रावसाहेबांना अण्णा म्हणत असे. तो म्हणाला,
“अण्णा, तुम्ही या शाळेची निवड केली आहे म्हणजे ती निश्चितच चांगली असणार. मी कांगडीला आनंदाने जाईन. आई देखील सारं समजून घेईल.”
रावसाहेबांना गीताबाईंपुढे हा विषय काढण्याचा धीर होत नव्हता. त्यांनी विनायकला गुलबर्ग्याला घेऊन जातो असे सांगून घरून नेले. इकडे कुंवर बहाद्दूरांनी देखील आपल्या मुलाला कांगडी येथी गुरुकुलात पाठवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांना १४ वर्षासाठी कांगडी गुरुकुलात दाखल करण्यात आले.
परत आल्यानंतर गीताबाईंना रावसाहेबांनी सत्य सांगितले. गीताबाईंच्या दुःखाला पारावर उरला नाही. उद्विग्न मनाने रावसाहेब बोलले,
“गीताबाई, कांगडी येथील गुरुकुल ही अतिशय उच्च प्रतीची शाळा आहे. विनायक या शाळेत शिकून पुढे निश्चितच कर्तृत्व दाखवेल याची हमी मी देतो. त्याच्या भवितव्यासाठी आपल्याला हा त्याग करावा लागेल. गुरुकुलाच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्याला वर्षातून एकदा भेटता येईल. विनायक काही काळासाठी आपल्यापासून दूर झाला असला तरी तो शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्यात परत येणार आहे.”
आवंढा गिळून रावसाहेब पुन्हा म्हणाले,
“हे सारं तुमच्या अपरोक्ष केलं यासाठी मात्र मी आपला कायमचा अपराधी आहे. तुम्ही तयार होणार नाही या भीतीने मी असं केलं. याबद्दल मी आपली क्षमा मागतो”
वर्षातून एकदा विनायकला भेटता येईल या आशेवर गीताबाईंनी हे मान्य केले. गीताबाईंनी वरकरणी हे सारे मान्य केले असले तरी त्यांना या साऱ्या प्रकरणाचं दुःख पचवायला बराच काळ लागला. पुढे कामाच्या व्यापात हळूहळू त्या रुळल्या. २९ जुलै २००३ साली रावसाहेब आणि गीताबाईंना तिसरे पुत्ररत्न झाले. त्यांचं नाव राम ठेवण्यात आले. पाठीवर एक कन्यारत्नही झाले. तिचे नाव गंगूताई ठेवण्यात आले. गीताबाई संसारात रमून गेल्या.
स्वप्न नेण्या पूर्तिला | पिढी उद्याची घडावी ||
अपुल्याच भावनांची | आहुती इथे पडावी ||